Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) 27 मे 2023
Daily Current Affairs in Marathi: Current Affairs (चालू घडामोडी) हा सर्वात महत्वाचा विषय आहे आणि जर आपण आपला वेळ मनापासून समर्पित केला तर आपण या विषयातून खूप चांगले गुण मिळवू शकतो. Current Affairs (चालू घडामोडी) च्या संबधीत MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, Police Constable, RRB, अशा अनेक स्पर्धापरीक्षांमध्ये बरेच प्रश्न विचारले जातात. Daily Current Affairs in Marathi विषय असा आहे ज्या बदल माहिती असेल तरच आपल्यला परीक्षेत उत्तरे देता येतात तेदेखील खूप कमी वेळात आणि तो वेळ आपल्याला दुसऱ्या प्रश्नांना वापरता येतो. म्हणून या विषयात (Daily Current Affairs in Marathi) चांगले गूण मिळवण्यासाठी आपल्याला देशात आणि जगात काय चालले आहे याची माहिती असणे खूप गरजेचे आहे.
येत्या प्रजासत्ताकदिनी ‘नारी शक्ती’चे दर्शन, कर्तव्यपथावर केवळ महिला सैनिकांचेच संचलन होण्याची शक्यता
- पुढल्या वर्षी प्रजासत्ताकदिनी, अर्थात २६ जानेवारी २०२४ रोजी ‘कर्तव्य पथा’वर केवळ महिला सैनिकांचा सहभाग असलेले संचलन अनुभवायला मिळण्याची शक्यता आहे. या संदर्भातील एका प्रस्तावावर काम सुरू असल्याची माहिती संरक्षण विभागातील सूत्रांनी दिली आहे. संरक्षण मंत्रालयाकडून गेल्या मार्चमध्ये तिन्ही सेना दले, विविध मंत्रालये आणि विभागांना २०२४ च्या प्रजासत्ताक दिन संचलनाच्या नियोजनाविषयी एक अंतर्गत सूचना पाठवण्यात आली होती.
- महिला सैनिकांच्या संचलनाबाबतचा प्रस्ताव विचाराधीन असून त्याबाबतची माहिती देण्यासाठी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडय़ात संरक्षण सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक घेण्यात आल्याचे या सूचनेत म्हटले होते. बैठकीत या प्रस्तावावर विचारविनिमय करण्यात आला असून २०२४च्या प्रजासत्ताक दिनाला केवळ महिला सैनिकांच्या तुकडय़ांचेच संचलन होईल, असा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे संचलनाबरोबरच वाद्यवृंद तसेच विविध मंत्रालये आणि राज्यांचे चित्ररथ तसेच अन्य सादरीकरणांमध्ये केवळ महिलांचाच सहभाग असण्याची शक्यता आहे. अलीकडच्या काळात सरकारने सशस्त्र दलांमध्ये महिलांचा सहभाग मोठय़ा प्रमाणावर वाढवण्याबाबत आग्रही भूमिका घेतली आहे.
एक पाऊल पुढे
यंदाच्या ७४ व्या प्रजासत्ताक दिन संचलनामध्ये भारताने आपले लष्करी सामथ्र्य आणि सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडवले. ‘नारी शक्ती’चे दर्शन ही मुख्य कल्पना होती. त्यात केरळ, कर्नाटक, तमिळनाडू, महाराष्ट्र आणि त्रिपुरा या राज्यांनी आपल्या चित्ररथांमधून ‘नारी शक्ती’ची झलक सादर केली होती. तसेच संचलनात भारतीय वायू सेनेच्या १४४ हवाई योद्धय़ांच्या तुकडीचे नेतृत्व तीन पुरुष अधिकाऱ्यांसह एका महिला अधिकाऱ्याने केले होते. आता देशाच्या ७५ व्या प्रजासत्ताकदिनी याच्या पुढे एक पाऊल टाकत कर्तव्यपथावर केवळ ‘नारी शक्ती’च अवतरण्याची शक्यता आहे.
“जगभरात पाकिस्तानची नाचक्की होतेय, देशाचा पैसा…”, बिलावल भुट्टोंच्या भारत दौऱ्यानंतर माजी पंतप्रधान इम्रान खान यांची टीका
- “पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी हे दहशतवाद उद्योगाचे प्रवर्तक, समर्थक आणि प्रवक्ते आहेत”, असा आरोप भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी शुक्रवारी ‘शांघाय सहकार्य संघटने’च्या (एससीओ) परिषदेतील बैठकीनंतर केला. याचे पडसाद आता पाकिस्तानातही उमटू लागले आहेत. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी बिलावल भुट्टो यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.
- पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ सध्या लंडनमधील चार्ल्स यांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी गेले आहेत. तर, बिलावल भुट्टो यांनी नुकताच भारत दौरा केला. यापार्श्वभूमीवर पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ पक्षाचे अध्यक्ष इम्रान खान यांनी या दोहोंवरही टीका केली आहे. ते पीटीआयच्या एका रॅलीत बोलत होते. “जगभरात पाकिस्तानची नाचक्की होत आहे. बिलावल भुट्टो तुम्ही संपूर्ण जगाचा दौरा करत आहात. पण त्याआधी सांगा की देशाचा पैसा दौऱ्यावर उडवण्याआधी कोणाला विचारता? या दौऱ्याचा फायदा किंवा तोटा काय?”, असा सवाल इम्रान खान यांनी उपस्थित केला.
- एससीओ बैठकीत बिलावल भुट्टो, यांनी भाषणात दहशतवादाला ‘‘राजनैतिक लाभाचे शस्त्र बनवले जाऊ नये’’ असे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून जयशंकर यांनी भुत्तो यांच्यावर तीव्र टीका केली. जयशंकर म्हणाले की, भुट्टो यांच्या, दहशतवादाचा शस्त्रासारखा वापर करण्याच्या विधानांतून त्यांची मानसिकता नकळतपणे प्रकट झाली.
भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर काय म्हणाले होते?
- एससीओ सदस्य देशाचे परराष्ट्र मंत्री म्हणून भुट्टो यांना त्यांच्या पदाप्रमाणे वागणूक दिली गेली. पाकिस्तानचा मुख्य आधार असलेल्या दहशतवाद उद्योगाचा प्रवर्तक, समर्थक आणि प्रवक्ता असा त्यांचा उल्लेख आम्ही केला आणि बैठकीतच त्यांच्या वक्तव्याचा प्रतिवाद करण्यात आला, असे जयशंकर यांनी पत्रकारांना सांगितले. ‘‘दहशतवादपीडित दहशतवादाच्या प्रवक्त्यांशी चर्चा करू शकत नाही,’’ असे खडेबोलही जयशंकर यांनी भुट्टो यांना ‘एससीओ’ परिषदेत सुनावले. ‘‘काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि राहील,’’ असा पुनरूच्चारही जयशंकर यांनी केला. दहशतवादाच्या मुद्यावर पाकिस्तानची विश्वासार्हता त्याच्या परकीय गंगाजळीपेक्षाही वेगाने घसरत आहे, असा टोलाही जयशंकर यांनी पाकिस्तानला लगावला.
लुटारू ब्रिटिश(?): राजघराण्यानेच घातला होता दरोडा !
चार्ल्स यांचा राज्याभिषेक सोहळा
- किंग चार्ल्स यांचा राज्याभिषेक समारंभ नुकताच मोठ्या जल्लोषात पार पडला. या सोहळ्यादरम्यान श्रीमंतीचे वारेमाप प्रदर्शन करण्यात आले. दागिन्यांपासून ते राजमुकूटापर्यंत सर्वच बाबतीत समृद्धी झळकत होती. राजघराण्यातील प्रत्येक व्यक्ती खानदानी सौंदर्याचे प्रदर्शन करताना संपूर्ण जगाने पाहिले. प्रश्न फक्त इतकाच आहे की खरोखरच या साऱ्या वस्तू त्यांच्या खानदानी आहेत? की चोरीच्या? कदाचित. काहींना ब्रिटीशांना चोर म्हटलेले रूचणार नाही. तरीही राज्याभिषेक समारंभात मुकूटावर न दिसलेला भारतीय कोहिनूर आणि दक्षिण आफ्रिकेचा द ग्रेट कुलीनन डायमंड नक्की काय सांगू पाहतोय हे लक्षात घेणे गरजेचे आहे.
राज्याभिषेक सोहळा व त्यावर निर्माण होणारे प्रश्न
- ट्विटरच्या माध्यमातून अनेकांनी या चोरीच्या समृद्धीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले. त्यातील रमेश श्रीवत्स यांनी राजा चार्ल्स आणि राणी कॅमिला यांच्या राज्याभिषेकाच्या एक दिवस आधी केलेले ट्विट भलतेच गाजले. आपल्या ट्विटद्वारे त्यांनी उपाध्यक्ष जगदीप धनखर, सोनम कपूर आणि सौरभ फडके यांनी राजा चार्ल्स यांच्या राज्याभिषेकादरम्यान कोहिनूर परत मिळवण्यासाठी एक क्लिष्ट पण चतुर योजना तयार केली असेल, असा खोचक टोला लगावला होता. काहींनी तर सोहळा संपताच कोहिनूर भारतात परत आणण्याची मागणी केली होती. केवळ भारतीय वस्तूच नाही तर वसाहतवादाच्या नावाखाली ब्रिटिशांनी ज्या देशांच्या वस्तू स्वतःच्या म्हणून हक्काने मायदेशी नेल्या; त्या सर्वच वस्तूंच्या बाबतीत चर्चा होताना दिसत आहे.
- राज्याभिषेक समारंभात प्रदर्शित केलेल्या अनमोल रेगॅलिया आणि दागिन्यांशी संबंधित इतिहास हा रक्तरंजीत आहे. असे असतानाही ब्रिटनच्या राजघराण्याने त्या वस्तू योग्य त्या मालकाकडे पोहोचविण्याचा प्रयत्न आजतागायत केलेला नाही. त्यामुळे त्यांनी त्या वस्तू त्यांच्या हक्काच्या मालकांना परत कराव्यात की नाही, यावर पुन्हा एकदा वादाला तोंड फुटले आहे.
कोहिनूर विषयी असलेल्या अफवा
- कोहिनूर हा हिरा पुरुषांसाठी शापित असल्याची अफवा आहे. जो पुरुष हा हिरा परिधान करतो त्याच्याकडून राज्य जाते. राणी व्हिक्टोरियाने सुरुवातीच्या काळात हा हिरा ब्रोच म्हणून परिधान केला होता. नंतरच्या काळात हा हिरा राणी अलेक्झांड्रा आणि क्वीन मेरीच्या मुकुटाचा भाग झाला. आजही हा हिरा मुकूटाचाच भाग आहे. १९३७ सालामध्ये राणी एलिझाबेथ (मदर-आई) हिच्या राज्यअभिषेकाच्या वेळेस हा मुकुट तयार करण्यात आला होता. या राणीने १९५३ सालामध्ये आपल्या मुलीच्या म्हणजे एलिझाबेथ दुसरी हिच्या राज्यअभिषेकाच्या वेळेस परिधान केला होता. सध्या हा हिरा टॉवर ऑफ लंडन येथील ज्वेल हाऊसमध्ये आहे.
जंतरमंतरवर आज महापंचायत
- आंदोलक कुस्तीगीर भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात आता अधिक आक्रमक झाले असून, लढय़ाला अधिक पाठिंबा मिळवण्यासाठी त्यांनी आज, रविवारी जंतरमंतरवरच महापंचायतीचे आयोजन केले आहे.
- भारताच्या प्रमुख कुस्तीगिरांच्या आंदोलनाचा शनिवारी १४वा दिवस होता. दिल्ली पोलिसांनी ब्रिजभूषण यांच्याविरुद्ध दोन गुन्हे दाखल केले असून, चौकशीलाही सुरुवात केली आहे. मात्र, कुस्तीगीर आंदोलन मागे घेण्याच्या तयारीत नाहीत.
- आजपर्यंत आम्हाला जो काही पाठिंबा दिला त्याबद्दल आभार. भविष्यात असाच पाठिंबा राहू द्यात, असे विनेश फोगट म्हणाली.
- राजकीय व्यक्तींकडून आंदोलनाला वेगळे वळण मिळाल्याचे कुस्तीगिरांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते. परंतु आता त्यांनी खाप पंचायती, किसान, मजूर संघटना, विद्यार्थी संघटना यांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. याचा एक भाग म्हणून रविवारी थेट जंतरमंतरवर पंचायतीचे आयोजन करण्यात आले आहे.
- ‘‘आम्ही सर्वजण शांततेत आंदोलन करत असल्यामुळे रविवारी आम्हाला पाठिंबा दर्शवण्यासाठी येणाऱ्या कुणालाही अडवू नये,’’ असे आवाहन विनेशने पोलिसांना केले आहे. त्याचबरोबर बजरंगने पाठिंबा दर्शविण्यासाठी नागरिकांना रविवारी सायंकाळी ७ वाजता मेणबत्ती मोर्चा काढण्याचे आवाहन केले आहे.
- आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी कुस्तीगिरांनी दोन समित्यांची स्थापना केली असून, तेच आता पुढील पाऊल ठरवतील असेही कुस्तीगिरांनी सांगितले.
MI vs CSK: ‘त्याच्यावर लक्ष ठेवण्याची गरज आहे’; एमएस धोनीकडून युवा गोलंदाजाचे कौतुक
- आयपीएल २०२३ मध्ये शनिवारी (६ मे) चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात चेपॉक स्टेडियमवर सामना झाला. या सामन्यात सीएसकेने एमआयवर ६ गडी राखून मात केली. सीएसकेकडून या सामन्यात मथीशा पाथिरानाने महत्वाची भूमिका बजावली. त्याने ४ षटकात केवळ १५ धावा देत ३ बळी घेतले. त्यामुळे येथील ‘प्लेअर ऑफ द मॅच’ म्हणून पाथीरानाची निवड करण्यात आली. सामना संपल्यानंतर कर्णधार धोनीने पाथिरानाची स्तुती करताना खास टिप्पणी केली. एमएस धोनीने म्हणाला, या गोलंदाजावर लक्ष ठेवण्याची गरज आहे. धोनीने हे शेवटचे का सांगितले, त्यामागचे कारणही सांगितले.
- धोनी म्हणाला, “तो (मथीशा) किती क्रिकेट खेळतोय यावर लक्ष ठेवण्याची गरज आहे. माझा विश्वास आहे की, तो अशा प्रकारचा खेळाडू नाही, ज्याने अधिक कसोटी क्रिकेट खेळावे. मला वाटते की त्याने वनडे फॉरमॅटही कमी खेळावे. होय, पण या (टी-२०)फॉरमॅटमध्ये त्याने आयसीसीच्या मोठ्या स्पर्धा खेळल्या पाहिजेत. तो असा गोलंदाज आहे, ज्याचा विशेष प्रसंगी वापर केला जाऊ शकतो. यासाठी, तो तंदुरुस्त राहणे आवश्यक आहे आणि जेव्हा जेव्हा आयसीसी स्पर्धा होतात तेव्हा त्यांच्यासाठी तो उपलब्ध असावा. तो श्रीलंकेसाठी खूप महत्त्वाचा ठरू शकतो.”
पाथिराना ‘ज्युनियर मलिंगा’ म्हणून ओळखला जातो –
- धोनीने बहुधा पाथिरानाच्या गोलंदाजीवर लक्ष ठेवा असे म्हटले आहे. पाथिराना काहीसा लसिथ मलिंगासारखा गोलंदाजी करतो. त्याला ‘ज्युनियर मलिंगा’ असेही म्हणतात. अशा प्रकारच्या बॉलिंग अॅक्शनसह अधिक क्रिकेट खेळणे हे गोलंदाजासाठी दुखापतीचे प्रमुख कारण बनू शकते. कदाचित त्यामुळेच धोनीने त्याला फक्त मोठ्या स्पर्धा खेळण्याचा सल्ला दिला असेल.